ग्रामीण महाराष्ट्राच्या गुणवत्तेची गरुड भरारी : शिवाजी विद्यापीठ

(विनंती: १९८८ ते १९९३ या काळात मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. या निमित्तान कृतज्ञतेच्या भावनेपोटी तो भूतकाळ जसा समोर आला, तसा लिहित गेलो. हा लेख हा त्या कालखंडाला जागवणारा आहे, परन्तु त्या नंतरच्या काळाशी निगडित असलेले सर्वच वाचक, हे माझ्या अनुभवाची मर्यादा आणि भावनावेगात झालेल्या संदर्भाच्या काही चूका समजुन घेतील, अशी अपेक्षा आहे.)   

मराठी भाषेला पहिलाज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणाऱ्या वि. स. खांडेकरांनी, कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक विजेत्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना म्हणून जे वाक्य लिहिलं आहे, त्याच स्मरण व्हावं असा हां क्षण… खांडेकर लिहितात “रत्नहाराचं तेजस्वी सौन्दर्य कुणाला समजावून सांगाव लागत नाही, डोळयांना ते आपोआपच जाणवतं, रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करीत बसत नाही, वाऱ्याच्या झुळके बरोबर आला की मन कस प्रसन्न होतं, लहान मुलाच्या नाजुक पाप्याची अविट गोडी समजण्यासाठी, काही पुस्तकी पांडीत्याची आवश्यकता नाही”. अगदी त्याच प्रमाण आज शिवाजी विद्यापीठाला नॅक मानांकनाची A++ ही श्रेणी मिळाल्या मूळे आम्हाला झालेला आनंद आम्हीही शब्दात व्यक्त करू शकत नाही.

पंचगंगेच्या तीरावर वसलेली शाहू नगरी; कोल्हापुर! कोल्हापुरकरांच्या विस्तीर्ण अंत:करणाची साक्ष देणारा रंकाळा तलाव, शालिनतेची, सर्वधर्मसमभावाची, स्वभिमानाची शाल पांघरलेली शिवाजीपेठ, आई भवानीचा जागर मांडणारा भवानी मंडप, करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिर, कायम गजबजलेलं कपिलतीर्थ, पंचगंगेच्या तीरावर विसावलेला उत्तरेश्वर, आंतरराष्ट्रीय मल्लानाही खुणावणारं खासबाग मैदान, कलावंतांची काशी असलेलं ‘केशवराव भोसले नाट्यगृह’, चोवीस तास धारोष्ण दुधाचा अभिषेक करणारी आणि मायेची तितकीच ऊब देणारी कोल्हापूरची संस्कृती, देशाच्या कानाकोपऱ्यातील मल्लांना आईच्या मायेन सांभळणाऱ्या तालमी, कलामहर्षी बाबुराव पेंटर, आबालाल रेहमान यांच्या पाऊलखुणा जपणारी ही भूमी, लहरी हैदर, पिराजिरावांच्या, पट्ठे बापुराव, आणि अगदी परवा निवर्तलेल्या शाहिर कुन्तिनाथ करके यांच्या डफाची थाप जिथे अजूनही ऐकू येते, त्या कोल्हापुरच्या इतिहासात, शिवाजी विद्यापीठाच्या निमित्ताने ‘शिक्षण क्षेत्रातही एक ऐतिहासिक दिवस उजाडला. प्रात:स्मरणीय शिवशककर्त्या छत्रपतिचे शिवरायांचे नाव धारण केलेल्या शिवाजी विद्यापीठाला, राष्ट्रीय स्तरावर भुषणावह ठरावे, असे A++  मानाकन मिळाले. अशा वेळी छत्रपतींच्या घोड्यांच्या टापांनी ज्या भूमीचा इतिहास लिहिला, परिवर्तनाची, विचारवंतांची आणि स्वाभिमानी देशभक्तांच्या वारसदारांचे विद्यापीठ म्हणून, एका नव्या परीप्रेक्षातुन शिवाजी विद्यापीठ समजून घ्यावे लागेल.

यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई  यांसारख्या सक्षम आणि लोकाभिमुख कार्य करणाऱ्या नेत्यांच्या द्रष्टेपणातून, 1962 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाची मुहूर्तमेढ डॉ. आप्पासाहेब पवार या तितक्याच द्रष्ट्या कुलगुरूंच्या कारकिर्दीत रोवली गेली. डॉ. आप्पासाहेब पवार यांनी जे पायाभूत काम केल, त्यामुळच त्यांच्या नावाचं ‘एक गारुड’ आजही या विद्यापीठाशी निगडित असलेल्या प्रत्येकाच्या मनावर स्वार आहे. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडलेला विद्यापिठाच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ, यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेला पहिला पदवी प्रदान समारंभ, अशा कितीतरी आठवणी सांगणाऱ्या पिढ्या त्या कालखंडाबद्दल भरभरून बोलत रहातात. आप्पासाहेब पवार कमवा-शिका योजनेतून पुढं आलेल्या, शिक्षणासाठी कोल्हापूरला यायलाही ज्यांच्या जवळ पैसे नव्हते, कधी अक्षरशः पायी तर कधी गावातल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या सोबत; सवलतीचा पास दाखवत प्रवास करून शिक्षण घेतलेल्या पिढ्यांच्या डोळ्यात आज मात्र विद्यापिठाच्या या यशानं आनंदाश्रु उभे केले, यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. विद्यापीठाच्या या यशाने आम्हां सर्व माजी विद्यार्थ्यांचे वयाचे, प्रतिष्ठेचे, विद्वत्तेचे सारे अविर्भाव गळून पडले आणि या पिढ्यांचे डोळे आनंदाने वाहून गेले, हेच खरं.

वसंतदादा पाटील, बालासाहेब देसाई ,यशवंतराव मोहिते यांच्या सहकार्याच्या सावलीत उभ राहिलेलं हे विद्यापीठ. शिक्षणतदन्य डॉ. जे. पी. नाईक आणि चित्रा नाईक यांनी मौनी विद्यापिठाच्या माध्यमातून याच भूमीत काही प्रयोग केले. पश्चिमे कडून वहात येणाऱ्या पंचगंगेच्या प्रवाहांनी समृद्ध केलेली कोल्हापूरची भूमी, कृष्णा आणि कोयनेच्या तीरावर पसरलेला सातारा-सांगली आणि चंद्रभागेच्या उभयतीरावर विसावलेली देवभूमि पंढरपुर-सोलापूर, हे या विद्यापीठाचे अनेक वर्ष कार्यक्षेत्र होतं. अलीकडे सोलापुर हे स्वतंत्र विद्यापीठ झालं,  परन्तु शिवाजी विद्यापिठाच्या या देदीप्यमान यशामूळ, या इतिहासाशी नातं सांगणाऱ्या लाखो अंतःकरणाच्या मनातील भावना जेंव्हा शब्दातीत आनंदान भरून गेल्या आहेत, असा हा धन्यतेचा क्षण.

राजारामपुरितुन आपण जेंव्हा पूर्वेकडे जातो, तेंव्हा तिथे ‘आपल्या मुलांना विद्यापीठाकडे घेऊन चाललेल्या  बाईचा (खरे तर आईचा) पुतळा लागतो आणि पूर्वेकडे दिसते ते पंढरीच्या पांडुरंगासारखे आपल्या कुशीत येणाऱ्या मुलाबाळांचे मायबाप होत, टेबलाईच्या उंच माळावर विसावलेले शिवाजी विद्यापीठ. आपल्या नजरेत मावणाऱ्या  उभ्या पश्चिम महाराष्ट्राचे, अर्धशतकाहुनही अधिक काळ घडलेल्या इथल्या परीवर्तन प्रवासाचे एक अबोल साक्षीदार शिवाजी विद्यापीठ. या मातीतल्या ग्रामीण गुणवतेचे मार्गदर्शक-पालक विद्यापीठ म्हणजे ‘शिवाजी विद्यापीठ’. इथला एक एक विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विचारवंत केवळ तत्वज्ञानाचा बोलका सुधारक न राहता आयुष्याच्या वाटेवर तो कर्ता-सुधारक झाला. जीवनाच्या वाटेवर आपल्या मातृसंस्थेने मनावर बिंबविलेल्या तत्व-मुल्यां पासून तसुभरही ढळला नाही, हेच विद्यापिठाच्या यशाचे खरे गमक आहे.  

विद्यापीठाला ए++ मानाकन मिळाल्याची बातमी मिळाली, तशी डोळ्यासमोर उभी राहिली ती विद्यापीठाची देखणी  ईमारत. तिच्या समोर उभा असलेला छत्रपति शिवरायांचा तो अश्वारुढ पुतळा, सभोवतालची देखणी बाग़, प्रत्येकाच्या मोबाईलच्या  स्टेटस मध्ये ती दिसू लागली. दिसू लागल्या त्या दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या विविध विभागांच्या इमारती, होस्टेल्स, हवेशीर जागा मिळावी म्हणून प्रवेशासाठी आम्ही जिच्या दारात पहाटे पासून उभे असायचो ती ‘विमान बिल्डिंग’, बॅ. खर्डेकर ग्रंथालय, विद्यापीठाची प्रेस, दवाखाना, कंझ्युमर स्टोर्स, जूने-नवे गेस्ट हॉउस, कुलगुरूंचा बंगला, कुलसचिव निवास, असे सारे सारे विश्व डोळ्या समोर तरळून गेले.

कोल्हापूरच्या याच मातीत जन्मलेले कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत सन्मानाने स्थान मिळविलेले प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवकवर्गाच्या संघ-शक्तीचा एक तेजस्वी अविष्कार म्हणून, विद्यापीठाला मिळालेल्या  या मानांकनाकडे बघावे लागेल.जेष्ठ पत्रकार श्री. विजय चोरमारे यांनी त्यांच्या लेखात लिहिल्या प्रमाणे स्थापने नंतर ‘आणखी एक खानावळ’ म्हणून निर्भत्सना झालेल्या या विद्यापीठाने, टीका करणाऱ्या या वृत्तीला, काळाच्या ओघात आपल्या आत्मतेजाची ताकत दाखवून एका अर्थाने शाश्वत उत्तरच दिले आहे.

कर्मवीर भाऊराव यांच्या खांद्यावर बसण्याचं भाग्य लाभलेले गुणवंत असे बॅरिस्टर पी. जी. पाटील सर, नामवंत वक्ते;प्रशासक म्हणून गौरव लाभलेले डॉ. के. भोगिशियन, न्यू कॉलेज या शिवाजी पेठेतील कॉलेजचे पहिले प्राचार्य डॉ. रा. कृ. कणबरकर, डॉ. के. बी. पवार,  डॉ. आप्पासाहेब वरुटे, सामाजिक विचारवंत म्हणून प्रसिद्धी लाभलेले डॉ. द. ना. धनागरे सर, आज देशातील विद्यापीठांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एम्. जी. ताकवले, डॉ. एन. जे. पवार, डॉ. देवानंद शिंदे यांनी आपापल्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या प्रगतीचा हा वारू निश्चितच पुढे नेला. कुलसचिव म्हणून काम केलेल्या डॉ. उषा इथापे, डॉ. बी. पी. साबळे आणि आज कार्यरत असणारे डॉ. नांदवडेकर यांनी प्रशासनाची उत्तम घडी घालून दिली. गुणवत्तेच्या या दीर्घ परंपरेचा विजय म्हणूनही विद्यापिठाच्या या यशाकडे बघावं लागेल.

दिसामासाने विद्यापीठ मोठे होत होते. काळाच्या त्या त्या टप्प्यावर विद्यापीठाला, सर्व विभागांना प्रगल्भ नेतृत्व लाभले. रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, हिंदी, इतिहास, मराठी, इंग्रजी, वृत्तपत्रविद्या, शिक्षणशास्त्र, बही:शाल शिक्षण, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, जैवशास्त्र, अलीकडच्या काळात भूषण ठरलेला डिस्टन्स एज्यूकेशन विभाग, नाट्य व् ललितकला विभाग या सर्वच विभागांनी विद्यापिठाच्या गौरवशाली इतिहासात मोलाची भर घातली आहे, हे आज पहाताना होणारा आनंद शब्दतित आहे.  

समाजाच्या भल्यासाठी काम केलेल्या, लोकशाहीचा आणि कर्तव्यनिष्ठेचा झेंडा घेतलेल्या प्राध्यापक आणि सेवक संघटनानी देखील वैचारिक संघर्षाच्या क्षणी, विद्यापिठाच्या इतिहासात, परिवक्वतेचे दर्शन घडवले. त्यामुळेच विद्यार्थीहित केंद्रस्थानी मानून काम करणारं एक विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाला लौकिक प्राप्त झाला. यातून एक सामाजिक मन तयार होत गेलं. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला इथं संधीचं अवकाश मिळू लागलं. गुणवत्तेच्या आधारे इथं संधी मिळते आहे, याचा विद्यार्थ्यांच्या मनी विश्वास जागा झाला. खेडोपाड्यात शिकणाऱ्या गुणवंत मुलांनी शाहूंच्या या भूमीत शिक्षण घेणं, हे घराला-गावाला आणि पंचक्रोशिला भूषण वाटू लागलं. विद्यापीठाच्या स्थापने नंतर जवळपास चाळीसवर्षं, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एस.टी.च्या ड्रायव्हर्स आणि कंडकटर्सनी; गावागावातून कोल्हापूरला शिकायला आलेल्या याच विद्यार्थ्यांचे डबे कोल्हापूरला वाहून आणले. ‘त्या डब्यांतील थंडगार झालेला घास; हा प्रसंगी पाण्या बरोबर गिळून या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पिढया मोठ्या झालेल्या आहेत, हे महत्वाचं आहे. कर्मवीरांच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा विद्यापीठ स्तरावर प्रभावशाली पद्धतीन राबविणारं शिवाजी विद्यापीठ हे देशातलं पहिलं विद्यापीठ. श्रमाशी आणि कष्टाशी असलेलं या पिढ्याचं नातं, त्यांना नेहमीच भुषणावह वाटतं आलं. विद्यापिठात शिक्षण घेत असताना पड़लेल्या दिवसांच्या आठवणी आजही डोळ्याच्या कडा सहजपणे ओलावून टाकतात.   या संदर्भात भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. के. डी. जाधव सर यांची आठवण मोठी बोलकी आहे. अगदी सुरवातीच्या काळात विद्यापीठाचा निकाल वर्तमान पत्रातून यायचा. शेवटच्या गाडीन कोल्हापूरला पोहोचाय. सगळी रात्र स्टैंडवरच झोपून काढायची. सकाळी आलेल्या वर्तमानपत्रात ‘विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत आलेली बातमी’ तिथेच स्टैंडवरच मिळायची. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या याच विद्यार्थ्यांची गावात बैलगाडीतून मिरवणुक निघायची, सत्कार व्हायचे, त्या साऱ्या पिढ्यांसाठी हे मानांकन महत्वाचे आहे.

अशाच मातीतल्या कसदार माणसांपैकी कितीतरी गुणवंतांनी पुढे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र आणि देशातील इतर विद्यापीठांचंही नेतृत्व केलं. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्यावर कर्मवीरांचा मोठा प्रभाव होता. प्री-डिग्रीला शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी असताना आणि पश्चिम महाराष्ट्राच विद्यापीठ म्हणून त्याना शिवाजी विद्यापीठा विषयी एक आपुलकी होती, आंतरिक जिव्हाळा होता. विद्यापीठ अनुदान आयोग आणि एआयसीटीई सारख्या राष्ट्रीय संस्थांचे सदस्यपद भूषविलेले कुलपती डॉ. शिवाजीराव कदम हे देखील याच शिवाजी विद्यापीठात शिकले. चार आणे वाचवण्यासाठी प्रसंगी मैलोनमैल चालत शिक्षण पूर्ण केलेली या माणसांनी पुढे आयुष्यभर माणसांच्याच चालत्या बोलत्या गुढ्यां उभ्या केल्या, हजारो संसार उभे केले.  

डॉ. अरुण अडसूळ नावाचा एक गुणवंत विद्यार्थी बार्शिला मामासाहेब जगदाळे कॉलेजमध्ये शिकला, शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या काळात शिवाजी विद्यापिठातुन एम्. एससी. होतं; पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद भुषविता झाला. पाटण तालुक्यातल्या साईंकड़े-तळमावल्या सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत प्राचार्य डॉ. के. आर. यादव हे शिवाजी विद्यापीठाचे प्रथम-प्रकुलगुरू झाले, आज भारती विद्यापीठाचे कुलगुरु असणारे डॉ. माणिकराव साळुंखे हे तर देशातील कितीतरी विद्यापीठांचे कुलगुरू झाले. विद्यापिठाच्या सामर्थ्याची प्रतीक असलेली अशी कितीतरी उदाहरण देता येतील.

माता लक्ष्मीबाईंच्या आणि कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेप्रति, बापूजींच्या विवेकानंद शिक्षण संस्थेप्रति, समाज परिवर्तनाचा झेंडा हाती घेतलेल्या भारती विद्यापीठासारख्या संस्थांच्या प्रति, स्वावलंबनाचा, सुसंस्कराचा, समाज-परीवर्तनाचा आणि दोन्ही हातानी समाजाला भरभरून परत करण्याचा संस्कार लाभलेल्या या संस्थांचा आदर्श समोर ठेवत, जिल्हा आणि तालुका स्तरावर, स्थानिक पातळीवर गुणवत्तेचा हाच पोत शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात इतर संस्था आणि संस्थापकांनीही पोसला. तत्वं-मूल्य आणि संस्करांना उरिशिरी धरणा ऱ्या शिक्षकांच्या पिढ्यांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्यांचं वैचारिक भरणपोषण केलं. यामुळच इथली मूलं शिकू शकली. अत्यंत लहान वयात शेतात काम करुन उदरनिर्वाह करणारे विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. अशोक करांडे भविषयात इंग्रजी विषयाचे नामवंत प्राध्यापक झाले, तर वाई तालुक्यातील अनपटवाडी सारख्या एका छोट्या खेड्यात कंदिलाच्या उजेडात शिकलेला रयतच्या लोणंद कॉलेजचा विद्यार्थी डॉ. केशव राजपुरे आज जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवित् विद्यापिठाच्या पदार्थविज्ञानशास्त्र विभागाचा विभागप्रमुख झाला. म्हणालात तर अगदी अलीकडच्या कालातिल ही प्रातिनिधिक उदाहरणे आहे आणि विद्यापिठात शिक्षण घेतलेल्या अनेकांच्या बाबतीत हेच खरे आहे. त्यामुलेच आज जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळविणारे तब्बल ८ प्राध्यापक या विद्यापिठात कार्यरत आहेत, हे यश अभूतपूर्व आहे.

विद्यापिठाच्या पदवीप्रदान समारंभाला येणारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्ति लाभलेले पाहुणे, भव्य सभामंडप, केवळ विणेच्या तारा छेडत डॉ. वैशम्पायन मॅडमच्या  प्रसन्न आवाजात सादर होणारे पसायदान, आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीत गाम्भीर्यपूर्वक  पार पडणारा समारंभ, पाहून्यांच्या भाषणात काही नवे शब्द शिकायला मिळतात का? ते पाहणारे माजी कुलगुरु बॅ. पी. जी. पाटील सर, पदवी घेणाऱ्या देखण्या स्नातकांनी फुललेला विद्यापीठाचा परिसर, ठिकठिकाणाहुन आलेले पालक, मान्यवर, विद्यार्थ्याना दिली जाणारी शपथ असा सर्वार्थाने सजलेल्या पदवीप्रदान समारंभाचे नेटके आयोजन अशा कितीतरी आठवणी आज या प्रसंगी आल्या खेरीज राहत नाही.

विद्यापिठाच्या परिक्षेत्रतिल चारही जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या, परिवर्तन चळवळीत मोलाची भर घालणारया कितीतरी सामाजिक संस्था, संघटना यांनी या विद्यापिठाच्या विद्यार्थ्याना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घडवलं. आचार्य शांताराम गरुड, नागनाथआन्ना नायकवडी, कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. संभाजीराव जाधव, डॉ. बाबुराव गुरव, प्रा. राम पवार अशा कितीतरी कर्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदानाच्या आठवणीचा आणि जागराचा हा क्षण. त्या शिवाय, आठवणी हे यश साजरे करता येणार नाही.

एम्.पी. एस. सी. च्या अध्यक्ष होण्याचा मान लाभलेल्या प्राचार्य सौ. सुमतिबाई पाटील यांच्या सारख्या प्राचार्यांच्या पिढयांचा विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्यावर शाश्वत प्रभाव होता. वि. स. खांडेकर यांच्या सारख्या भाषाप्रभूच्या अशिर्वादाने पुलकित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पिढयांना, तत्कालीन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. के. देसाई, डॉ. एस. व्ही. शास्त्री, डॉ. चंद्रशेखर जहागिरदार आदि मान्यवर विद्वानांच्या  सहवासाचे भाग्य लाभले. ‘ज्याला काही येते त्याला कोणीही शिकविल पण ज्याला शिकविण्याची गरज आहे, अशा होतकरू विद्यार्थ्याना त्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमता वाढवत; कुटुम्बातील सद्स्यप्रमाणे  घड्विणारा डॉ. पी. ए. अत्तार सर यांच्या सारखा शिक्षक विरळाच म्हणावा लागेल. विद्यापिठाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख हे जसे त्यांच्या त्यांच्या विषयात पारंगत होते, तसेच त्याना तत्वज्ञानाचीही चांगली जाण होती, म्हणुनच राज्यशास्त्र शिकविनणारे डॉ. के. के. कावळेकर, डॉ. अशोक चौसाळकर यांच्या व्यक्तिम्त्वा बद्दल सर्वच विषयाच्या विद्यार्थ्यांच्यात एक कुतूहल असायचं. डॉ. गो. मा. पवार, डॉ. ल. रा. नसिराबादकर, डॉ. विश्वनाथ शिंदे आदींच्या भाषा विषयक, लोकसाहित्य विषयक ज्ञानाप्रति विद्यार्थ्यांच्या मनात आजही अपार आदर भावनाआहे..      

आज जगाला अपेक्षित असलेल्या संशोधन विषयांत विज्ञान विभागानी विद्यापीठाची पाठराखण केल्याचे दिसते. स्कोपस आणि मान्यता प्राप्त  आंतरराष्ट्रीय इंडेक्स जर्नल्स मधील शोधनिबंध, संशोधनाची सद्य जगतातील आंतरराष्ट्रीय परिमाणे याबाबतीत विद्यापिठाच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्र-विज्ञान विभागांनी मोलाची भर घातली आणि यामुळेच हे यश मिळू शकले, असेच म्हणावे लागेल. संशोधनातून  प्रकल्पातुन प्राध्यापकांनी, विद्यापीठ अनुदान आयोग तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळविलेल्या: कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातुन विद्यापिठाच्या प्रगतीला विशेष हातभार लाभत गेला. विद्यार्थ्यांच्या, संशोधक आणि मार्गदर्शकांच्या पिढ्या-पिढ्या एकमेकाला उभ्या  करत गेल्या आणि मग गोपाळकाल्याची दहिहंडी हाती यावी तशी आणि NAAC च्या मुल्य्मापनाची A++ ही ग्रेड हाती आली.      

अभ्यासक्रमाचा दर्जा, पारंपरिक आणि अभिमत तसेच स्वायत्त महाविद्याल्यांच्या निमित्ताने आज व्यक्त होत असणारी महाविद्याल्यांची गुणवत्ता वाढ, संशोधन परम्परा; संशोधन शुचित्व आणि काळाच्या ओघात निर्माण झालेल्या मापदंडांचे पालन, यासाठी शिवाजी विद्यापीठाची देशपातळीवर प्रमुख ओळख आहे. इथल्या पी.एचडीच्या विद्यार्थ्यांचे थेसिस तपासताना, परीक्षेचे कामकाज करताना, बाहेरील विद्यापिठांतील प्राध्यापक, हे शिवाजी विद्यापीठ कार्यपद्धतीचा आवर्जुन उल्लेख करतात. शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने तर देशपातळीवर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष जड़ण घडणिशी ज्यांचा प्रत्यक्ष सम्बन्ध येतो ते विभाग म्हणजे विद्यार्थी कल्याण विभाग, एन. एस. एस. आणि कमवा-शिका योजने अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन. आपल्याला दिले गेलेले काम भक्तिभावाने करण्याच्या त्यांच्या याच स्वभावामुळे, प्रा. आर. एस. माने आदि सर्व समन्वयक-प्राध्यापकांच्या नावांची मोहोर विद्यार्थ्यांच्या कितीतरी पिढयांच्या आयुष्यावर यामुळेच उमटली आहे.  

या सर्व यशाचा विचार करताना विद्यापिठातील प्रशासकीय सेवक वर्गाचा आणि त्यानी दीर्घ काळ आपल्या कामातून उभ्या केलेल्या विद्यापिठाच्या प्रतिमेचा विशेष उल्लेख करावा लागेल. आपल्या विद्यापीठा विषयी त्यांना वाटणारा कमालीचा अभिमान, हे त्यांच वैशिष्ट्य. दिलेल काम सजातीय मानसिकतेनं करणारा आणि आपल्या विद्यापिठातील आजी-माजी प्राध्यापकांच्या क्षमते बद्दल भरभरून बोलणारा, प्रश्न सोडविण्याची मानसिकता असलेला, विद्यार्थ्याना आपलेपणानं वागविणारा प्रशासकीय सेवकवर्ग म्हणून,  शिवाजी विद्यापीठ सेवक वर्गाचा उल्लेख करावा लागेल.

विद्यापिठाची अभ्यास मंडळे, अधिसभा, विद्वत-सभा, कार्यकारीणी अशा सर्व स्तरांवर होणारी बौद्धिक आणि सकारात्मक चर्चा, विद्यापीठ आणि विद्यार्थी कल्याणाच्या वाटेवर आपापसातील मतभेदांच्या भिंती पाडून टाकणाऱ्या संघटना, विद्यापीठाने घालून दिलेल्या आचारसंहितेचा आदर करणारे संस्थापक, प्राचार्य आणि सभोवतालचा सारा समाज, या साऱ्या-साऱ्या घटकांच्या तप:श्चर्येचे फलित म्हणून विद्यापिठाच्या या भव्य-दिव्य यशाकडे पहावे लागेल.जगात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आणि काही शतकांच्या प्रवासाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या विद्यापिठांच्या गुणवत्तेशी नात सांगणार यश; आज शिवाजी विद्यापीठाला मिळालं आहे. मोठं  यश मिळवून आईच्या कुशीत शिरताना, आपल्या डोक्यावरून फिरणारा तिच्या हाताचा स्पर्श अनुभवताना होणारा आनंद, आज विद्यापिठाशी नातं असलेला प्रत्येकजण अनुभवतो आहे. ना. धो. महानोरांच्या शब्दातच सांगायच तर:

या मातीने लळा लावला असा असा की, सुखदु:खाला परस्परांच्या हसलो रडलो

याने तर हा जीवच अवघा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो II

 यासाठीच ‘मी कोण आहे, हे विचारण्यापेक्षा, मी कुठून आलो? हे आज मह्त्वाचे आहे. मातीत ज्यांचे जन्म मळले,  त्यानीच आज गुणवत्तेचे आकाश पेलले आहे. आज जगाच्या पाठीवर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत; सर्वदूर पसरलेल्या, संकटांवर स्वार होणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जी यशोगाथा आहे, तीच यशोगाथा त्याना उरिशिरी धरणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचीही आहे, यातच या यशाचं, आनंदाचं आणि सर्वांच्या अन्तकरणात भरून पावलेल्या समाधानाचं सार सामावलं आहे. ही विजयश्री ज्यानी खेचून आणली ते विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के सर, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील आणि सम्बंधित सर्व घटकांचे या विद्यापिठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनापासून अभिनन्दन.

प्राध्यापक (डॉ. विवेक रणखांबे)

भारती विद्यापीठ, पुणे

        (लेखक, हे शिवाजी विद्यापिठाच्या इंग्रजी विभागाचे, शिवाजी कॉलेज-सातारा आणि न्यू कॉलेज, कोल्हापूरचे माजी विद्यार्थी आहेत)

Mobile: 9850558404, Email: vivekrankhambe@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *