“गाव रिकामे होताना, ‘तो’ शेवटी उभा होता”
वारस कर्तृत्वाचा,
हा गहिवर माणुसकीचा.
पुराच्या छाताडावर पाय ठेवून उभा,
नेता पलूस-कडेगावचा...
पत्ता शोधत घराचा, कृष्णामाई माई दारी आली,
उर भरून जावा, तशी अंगणात भरुन उरली...
कष्टाने जे कमवले, जमेल ते मी सवे घेतले,
माझ्या संगे देव्हाऱ्यातले, देव देखील बाहेर पडले.
उर भरून नदी जेव्हा,
कवतीकाने पावली,
भरल्या दारी पदर पसरून, शांत उभी राहिली, तिच्या पदरी सुख बांधून, सारं शून्य करून गेली..
हम्बरताना गाय बघून,
पाय मग मागे फिरले.
धीर धरून पाय उरात रोवून, घर माझे, मुके एकटेच मागे उरले.
रक्ताच्या नात्यानीही जेंव्हा फिरवली होती पाठ,
साहेबाच्या वाघाने बांधला,
तेंव्हा कृतज्ञतेचा घाट...
मगरमिठीतून पुराच्या, तो वेढा फोडुन पोहोचला होता..
माझ्यासाठी माझा आमदार, माहेर होवुनी धावला होता..
घुसली असती जी माझ्या पायात,
त्या काचेवर त्याने स्वतःचा पाय ठेवला होता,
भळभळणारी जखम घेऊन,
तो हसत मुखानं फिरला होता.
ऐकल होतं की,
हळदी भरल्या अंगानं, बोहल्यावरून उतरताच,
शेकडो मैल दुष्काळात तो,
रणरणत्या उन्हात चालला होता,
पटलं हे तेंव्हाच,
जेंव्हा संकटाच्या दारात,
मला तो उरा-उरी भेटला होता...
“देवादारी बांधलेली, सगळीच घरटी शेणाची”,
भिजली-बुडली डोळ्यादेखत, गेली कितीक वाहून,
“पुन्हा एकदा सांधू आपण,” हा शब्द घ्या बांधून...
त्यानचं तर रातोरात सारं गाव हलवलं,
भूक लागली तेंव्हा त्यानचं,
आख्ख गावं जेवू घातलं...
डोक्यावरती आभाळ कोसळलं,
तेंव्हा त्यानचं तर पांघरून घातलं..
डोळे वाहून जाताना,
त्यानंच फाटकं आभाळ झेललं ..
नको उपदेश अन कोरडी सहानुभूती,
नकोत डोळ्यात दिसणारे ते अनंत उपकार,
‘गावातून जाणारा- 'असेन मी शेवटचा’,
मरण दारात उभे होते तेंव्हा, त्याचे हे शब्दच झाले लाख मोलाचा आधार..
दिवस-रात्र महापुरात, अनवाणी तो फिरला होता,
मरणाच्या भीतीने, तो काठावरच थांबला नव्हता.
ज्याला ‘त्याने वाचवले’ तो ईश्वराचा अंश होता,
वाचवलेला प्रत्येकजण,“त्याच्या कुटुंबातला” माणूस होता.
मदतीचा हात देताना, तो सर्वात पुढे होता.
गाव रिकामे होताना, तो शेवटी उभा होता.
आमच्यासाठी ज्याच्या डोळ्यात,
आम्ही अश्रूंचा महापूर पाहिला,
माणुसकीच्या देवळात उभा,
एक ‘देव’आम्ही पहिला...
...प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, पुणदी (ता. पलूस)


अप्रतिम… केवळ अप्रतिम…
प्रसंग जेवढा भीषण होता… तेवढाच आधार ही मोठा होता…
फार सुंदर शब्दात मांडलय तुम्हीं…
Khup chaan shabdat Mandalay sir.
सर
खूपच हृद्य शब्दातील वर्णन
लोकनेता कसाअसावा…. सामान्य माणसाच्या दुःखात एका नव्या जोमाने उभा राहणारा…
लोक प्रतिनिधी विषयी शब्दबद्ध केलेला भावनांचा कल्लोळ……. खूप छान..
अतिशय वास्तववादी आणि सुंदर विचार सर..!🙏