“आण्णा”: चिरंतन स्फुर्तीचा चैतन्यदायी झरा ! …..तानाजी माने, सातारा-रोड

आज मितीला संघाला कोण ओळखत नाही? केवळ आपत्तीच्या प्रसंगीच नव्हे तर सदैव राष्ट्रसेवे साठी तत्पर राहणार्या नव्हेतर राष्ट्र सेवेसाठी आपले तन,मन व धन सर्वस्व अर्पण करणारे स्वयंसेवक निर्मितीचा एका अर्थाने कारखाना म्हणजे संघ ,रुढार्थाने परिचित असलेलं RSS
अर्थात शारीरिक,बौद्धीक, सेवा व संपर्क या चतुःसुत्री वर आधारीत संघाची शाखा.व शाखेच्या माध्यमातुन तयार झालेले स्वयंसेवक व कार्यकर्ते .
आज ही मला माझा शाखेतला पहिला दिवस आठवतोय १९८४ च्या दरम्यान चा कालावधी असेल.माझा थोरला भाऊ शाखेत जात होता व मला तुझ्या बरोबर यायचं आहे म्हणल्यांवर तु अजुन लहान आहेस.असं सांगुन टाळाटाळ करत होता.म्हणून मीच एकदा गुपचुप त्याच्या मागोमाग सातारारोड च्या मध्यवर्ती असलेल्या नवयुग वाचनालयाच्या शेजारच्या मैदानावर शाखा होती. मैदानाच्या एका बाजुला मधोमध भगवा झेंडा लावलेला त्या झेंड्याला प्रणाम करायचा व नंतर मुख्य शिक्षक या नात्याने (आण्णांना) प्रणाम करायचा म्हणजे आपली शाखेतली प्रवेशाची प्रक्रिया पुर्ण झाली, यासाठी प्रणाम करायचा ई. जुजबी आचारपद्धती सांगितली. मी ही तसं केलं व आण्णांच्या समोर प्रणामासाठी उभा राहिलो. तेव्हा झालेलं आण्णांंचं प्रथम दर्शन माझ्या बालमना मनावर एक छाप पाडुन गेलं.पुढं मी पण आता रोज शाखेत जायला लागलो.एकदा चांदनी भोजनाच्या निमित्तानं एकत्र आलेलो तेव्हा आण्णांनी सांगीतलेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट ‘व्यक्ती पेक्षा तत्व मोठे’ हा जीवनाचा गर्भितार्थ सांगुन गेली.
आण्णा मुळचे सांगली जिल्ह्यातील पुणदीचे. नोकरी च्या निमित्ताने सातारारोड ला स्थाईक झाले.
विशेष म्हणजे आण्णा काही लहानपणा पासुन स्वयंसेवक नव्हते .तर आण्णांचा चिरंजीव विवेक लहान असताना शाखेत जायचा एके दिवशी त्याला यायला उशिर झाला.म्हणून आण्णा शोधत शोधत संघस्थानावर पोहोचले .समोरचे चित्र बघुन भारावुन गेले. लहान लहान मुलांसमेवेत हणमंतराव फाळके (हण्माभाऊ) गोल मंडल करुन गप्पा मारत होते.
आण्णा खरोखर भारावुन गेले व वारंवार शाखेवर जाऊ लागले.१९८३ च्या महाराष्ट्र प्रांताच्या तळजाई पठारावर झालेल्या संघ स्वरुपाच्या विराट दर्शनाने खर्याअर्थाने आण्णा संघाच्या प्रेमात पडले व आण्णा संघरुप झाले.
तळजाई वरुन परत आल्यावर आण्णांकडे कोरेगाव तालुक्याच्या कार्यवाह संदर्भात बोलनी करण्यासाठी सुहासराव हिरेमठ आलेले असताना. क्षणभर सौभाग्यवतीच्या चेहर्याकडे बघुन आण्णांनी होकारार्थी मान हलवली. आण्णांच्या सम्पूर्ण संघकार्यात त्यांच्या पत्नी सुभद्रा यांचा महत्वाचा वाटा आहे. खरोखरच आण्णांच्या निस्वार्थ राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मावशीच होत्या. आण्णा तालुका कार्यवाह झाल्यावर दुपारी सव्वाचार ला कंपनीतुन सुटल्यावर घरीयायचं थोडं फ्रेश व्हायचं आणि झोळीत हाफपॕन्ट एकाधी वही घेऊन सायकल वर प्रवास सुरुव्हायचा ते माघारी उशिरा रात्री परत यायचे.अश्या वेळी आपलं घर नदी काठी निर्जन ठिकाणी आहे. याची आण्णांना चिंता नसायची.
प्रचंड मेहनतिने आण्णांनी कोरेगाव तालुका संघमय केला.
मुलं ही आता मोठी झाली.(आण्णांना तीन मुलं सौ. सुनंदाताई, सौ. वसुंधरा अर्थात माई व विवेकानंद )
मात्र नियतीच्या मनांत काहि वेगळंच होतं .अचानक कामगार कपातीचं वारं फीरलं व आण्णांना नोकरी सोडावी लागली. पण आण्णा डगमगले नाहीत.
मुलांच्या शिक्षणासाठी व एकुणच उदरनिर्वाहासाठी काही ना काही उद्योग करायचा म्हणून आण्णा पंढरपुरला मित्राच्या शेतीवर लक्ष ठेवण्यासाठी पंढरपुर ला गेले. तिथंपासुन आमचा संपर्क कमी झाला.
पण पुढं मुलांची शिक्षणं पुर्ण झाली ताई ,माईचं लग्न झालं तसं आण्णांनी ठरवलं आण्णा परत सातारारोड ला आले. आत्ता परत राहत असलेल्या पत्र्याच्या घरांशेजारीच छोटसं टुमदार सिंमेट विटांच “सर्वोदय” साकारलं.
सौभाग्यवती व विवेकानंद इथे राहतिल व पुर्णवेळ आता विश्व हिंदु परीषदेच काम करणार असं ठरवुन आण्णा पुर्णवेळ म्हणून बाहेर पडले. मुळातच कामाची तळमळ व माणसं जोडण्याची विलक्षण हातोटी असलेल्या या या आवलियानं काही वर्षांतच कामाचं जाळं विणलं.
कामाची प्रचंढ तळमळ असुन देखिल मावशी, विवेक, ताई, माईच नव्हेतर आपल्या सहज संपर्कातुन जिव्हाळ्याने जोडलेली अनेक नाती यांच्या कडे त्यांचे लक्ष होते.
विलक्षण व्यापा मध्ये आण्णांनी दुर्लक्ष केलं ते म्हणजे फक्त आपल्या प्रकृतीकडे. परीणाम स्वरुप २२/४/२००६ला आण्णा या लोकाची यात्रा संपवुन.आपल्यातुन निघुन गेले. परंतु आज ही सातारारोड मध्ये आण्णांच्या बरोबर मी ही शाखेत जायचो असं म्हणनारे व माझ्या जीवनात मला आण्णांनी घडविलं असं अभिमानांन सांगणारी अनेक रत्न आहेत.
“विकसित व्हावे अर्पित होउन जावे!परीसरातल्या अनु रेणुतुन, अविरत वेचुन तेजाचे कणं!!
रसगंघाशी समरस होउन ,हृदय कमल फुलवावे!!!” संघगीतातल्या या ओळी म्हणजे स्व.आण्णांना आजच्या त्यांच्या स्मृतीदिनी वाहलेली शब्दसुमनांजली होय.


…लेखन: तानाजी माने, सातारा-रोड

6 thoughts on ““आण्णा”: चिरंतन स्फुर्तीचा चैतन्यदायी झरा ! …..तानाजी माने, सातारा-रोड”

  1. संजय कुलकर्णी

    खूप छानच आठवणी लिहिल्या आहेत, आण्णा बरोबर अनेक वर्षे विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ काम केलं संपर्क अण्णांचा दांडगा ,स्वभाव प्रेमळ ,बैठकीत, वर्गात आण्णा बरोबर राहण्याचा योग आला, असा समर्पित कार्यकर्ता, शेवटच्या श्वासा पर्यंत संघ मय जीवन जगले माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत होते व पुढेही प्रेरणा मिळत राहील हीच भावपूर्ण पुष्पांजली

  2. संजय कुलकर्णी

    तानाजी माने यांनी अण्णांच्या आठवणी जागवल्या आण्णा बरोबर अनेक वर्षे परिषदेचे काम करण्याचे भाग्य मला मिळाले अण्णांचा संपर्क दांडगा ,प्रचंड प्रवास,त्यानी अनेकांना पूर्णवेळ म्हणून काढले,प्रेमळ स्वभाव त्यामुळेच आण्णा कोणालाही सहजपणे आपलेसे करत व कामात जोडत आण्णा शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिले त्यांची हीच प्रेरणा आम्हाला पुढेही काम करताना उमेद देत आहे माझ्याकडून अण्णांना भावपूर्ण पुष्पांजली

  3. Umesh Pandhare

    दादा… आण्णा गेल्याचे वाटतच नाही… अनेक आठवणी आहेत मनाला उभारी देणारे आण्णा….1996 ला SYBA ची परीक्षा झाली मी अनिलकडे गेलो होतो… तिथे प्रथम आण्णा भेटले.. आम्हा दोघाला म्हणाले… सासवड ला मे अखेरीस बजरंग दलाचा 10 दिवसाचा अभ्यासवर्ग आहे. तारीख सांगून गेले. परंतु त्या तारखेला आम्ही दोघे गेलोच नाही कारण तिथं 100/-रुपये भरायचे होते, तसेच रेल्वे चा. खर्च.. त्या वर्गात आण्णानी आम्हाला शोधले, आम्ही आलो नाही बघून ते परत पुणदीला आले आणि रात्रीच्या पॅसेंजरने आम्हाला घेऊन गेले. तो माझा संघ प्रवेश. त्या वर्गात मला जेवताना शर्टाला बॅच नव्हता म्हणून उठवले, त्या रागात मी जेवलोच नाही, रात्री उशिरा आण्णांनी मला उठवले, ते म्हणाले मी पण जेवलो नाही, चल आपण दोघे जेऊ. मग जेवलो.. संभाजीनगर (औरंगाबाद )च्या तर 3 वर्षातील खूप आठवणी आहेत… अण्णांच्या अकाली जाण्याचे कळल्यानंतर बरेच वर्षे किंवा अजूनही ते कुठेतरी प्रवासाला गेल्याचे वाटते… असो… हा दिवसही आठवू नये असे वाटते…… भावपुर्ण शब्द सुमनांजली…
    उमेश धोंडीराम पंढरे… पुणे

  4. सुमुख माने

    कडक शिस्तीबरोबरच मनाने अति प्रेमल आनां आपल्या सर्वांचे खरोखरच प्रेरणास्थान होते. त्यांचा सहवास फार कमी लाभला. त्यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन.😢💐

  5. आण्णांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मी अगोदर वाचले आहेच आणि मला माहित देखील आहे. यानिमित्ताने तानाजीराव माने यांनी आण्णांची नवीन ओळख करून दिली. एखाद्या सामाजिक संघटनेचे पूर्णवेळ समर्पित होऊन काम करणं विरळच ! आपली संस्कृती व राष्ट्रभक्ती प्रसार व संवर्धनासाठी आण्णांनी स्वतःस संघाच्या माध्यमातून दोन तप तरी वाहून घेतलं होतं. त्यांची साधी राहणी, समाजसुधारणेचे वेड, निश्चयी स्वभाव व शिस्त माझ्या लक्षात आहे. खेडोपाडी जाऊन प्रचारकाचे काम करताना मी त्यांना पाहिलं आहे. त्यांचे समर्पण न विसरण्याजोगच !

    आण्णांनी स्वतःला पूर्णवेळ शाखेच्या कार्यास वाहून घेतले होते. त्यात त्यांच्या नोकरीरहित पणाचा आपणा भावंडाच्या शिक्षणावर कसा परिणाम झाला असावा हे आपण दोघांनीही गरिबीतून शिक्षण घेतलं असल्यामुळे मी जाणतो. पण त्या अडचणीच्या काळी मावशींनी खंबीरपणे आण्णांना साथ दिल्यानेच सर्व सोपस्कर झालं. तुमच्या सातारा व कोल्हापूर येथील घरी मी आलो होतोच. पुढे दाजींचा आठवडाभराचा सहवास मला कुटुंबाच्या आणखीन जवळ घेऊन गेला. तुम्हा सर्व भावंडांची व्यक्तिमत्व मावशी व अण्णांच्या व्यक्तिमत्वांची मिश्रण आहेत असं मला वाटतं. तू आणि ताई तर हुबेहूब आण्णाच ! माईला भेटण्याचा कधी योग आला नाही. ती पलूस येथे हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे एवढं तुझ्या बोलण्यातून आलं होतं. मावशींच्या स्वभावातील मृदुता, व आण्णांनी मूल्यवर्धित कठोर शिस्त आपल्या वागण्यातून प्रतीत होते. 

    पण माझी अशी धारणा आहे की तुझे विचार, लेखन-वक्तृत्व कौशल्य व एकूणच व्यक्तिमत्त्व ही आण्णांचीच देण आहे. त्यांच्याप्रमाणे समाजसुधारणा, चांगुलपणा व संस्कार जतन तु देखील करतोयसच पण यासाठी आण्णांप्रमाणे तुला कष्टमय प्रवास करावा लागत नाही, तुझा मार्ग वेगळा आहे इतकच !

    माणूस असेपर्यंत आपल्याला त्याची कमी जाणवत नाही. किंबहुना ते असताना आपण त्यांची आपल्यातील अनुपस्थिती मानायलाच तयार नसतो. तसंच आपल्या वडिलांच्या बाबतीत असतं हे मला माहित आहे. त्यांचा असण आपल्यासाठी खूप मोठा आधार असतो. आपलं माणूस सदोदित सोबत हवाहवासाच वाटतो. आपला स्वार्थ जपताना नियतीच्या इच्छेपुढे जाऊन चालत नाही. परमेश्वराने घालून दिलेले आयुष्यरेखा आपल्याला इच्छा असून वाढवता येत नाही. मग आपल्या हातात उरतं ते त्यांच्या संस्काररुपी शिदोरीसोबत त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर मार्गाक्रमण करणे. आपलं जगणं म्हणजेच त्यांचे अस्तित्व आहे हे मानणं..

    अण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन … 

    – केशव राजपुरे (rajpure.blogspot.com)

  6. सुंदर लेख, पुढच्या पिढीला एक प्रेरणादायी स्त्रोत म्हणून ती. आण्णांच्या ध्येयाने भारलेल्या आयुष्याकडे पाहावे लागेल! अशी व्यक्तिमत्वे क्वचितच पाहायला मिळतात!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *